छानशा वळणावरी आयुष्य थोडे थांबले
अन् पुढे चालायचे बळ त्या शिदोरीने दिले
ऐकतो सगळे नवे अन् दादही देतोच की
पण जुन्या गाण्यांत मिळते खास काही आपले
तीळ गालावर तुझ्या अन् गूळ ओठांवर तुझ्या
बघ तुझे पंचांग म्हणते, उत्तरायण लागले
अंबराचा स्पर्श झाला एकदा केव्हातरी
त्यापुढे मातीवरी सगळे सुखाने राहिले
युद्ध त्यांनी जिंकले पण द्वेष नव्हता संपला
दुश्मनाचे प्रेतसुद्धा शेवटी लाथाडले
देव मानू की नको, चर्चा सुरू मूर्तीपुढे
मी पुढे जाऊन केवळ फूल त्यावर वाहिले