शंका  

यवन तर स्वर्गामधे दिसणार नाही ना?
इंद्रसुद्धा सेक्युलर निघणार नाही ना?

शक्यता दिसल्या नव्या प्रत्येक घटनेच्या
मी समांतर जीवने जगणार नाही ना?

झोपल्यावर जग कुणाची आठवण येते?
या जगाला हे गुपित कळणार नाही ना?

क्षणभराच्या निर्णयाची जन्मभर शंका
मी लढाईच्या क्षणी पळणार नाही ना?

त्याग कर आहार निद्रा मैथुनाचाही
भय तरीही शेवटी उरणार नाही ना?

देव मानू की नको, चर्चा करत बसलो
तर कुठेही शाश्वती मिळणार नाही ना!

-भूषण कुलकर्णी 

वाडा  

वेदनांची आठवण आली पुन्हा
आठवांची वेदना झाली पुन्हा 

मोह वाड्यावर कुणाचा राहिला?
वाढल्या भिंतीवरी पाली पुन्हा 

घेतली नव्हती दखल समजू नको
एकदा रेंगाळ भवताली पुन्हा 

कळत नाही मित्र कोणाला म्हणू?
भासतो सुग्रीव हा वाली पुन्हा!

पाय नवऱ्यावर उगा ठेवू नको
व्हायचे झालेच जर काली पुन्हा 

वैर संपेना कधी मरणामुळे
प्रेत खेळू लागले चाली पुन्हा 

-भूषण कुलकर्णी 

व्यवस्था  

ज्या स्वप्नाच्या मागे पळतो, नंतर कळते नको मला ते 
माझ्या कोत्या कल्पनेत जे येऊ शकते, नको मला ते 

भल्याबुऱ्या लाखो लोकांनी बनलेल्या आहेत व्यवस्था 
हळूहळू कोणीही त्यांचा हिस्सा बनते, नको मला ते

काया, वाचेवर होती ती सर्व बंधने सुटू लागली 
म्हणे तरीही काळिज त्यांचे निर्मळ असते! नको मला ते  

पुढे आणखी कसे जायचे विचारतो अनुभवी जनांना
ती व्यक्ती पहिलीच पायरी सांगत बसते, नको मला ते 

बऱ्याच दुःखांवरती कुठली कृती करावी समजत नाही 
सवयीने एखादी हळवी कविता सुचते.. नको मला ते 

-भूषण कुलकर्णी

निरीक्षण

एक विनंती केली आहे ताऱ्याने 
मला नका बोलावू कुठल्या नावाने 

उगाच रेषा जोडत बसलो त्याच्याशी 
तारा बसला होता स्वतंत्र मानाने 

स्वतःभोवती, जगाभोवती फिरत रहा 
काळ व्यापला आहे एका कामाने 

देश सोडला स्वतंत्र जगण्यासाठी मी
अता बंधने घातलीत परदेशाने 

फक्त निरीक्षण करतो हल्ली दुनियेचे 
समाज काही बदलत नाही माझ्याने 

युद्धासाठी आसुसलेली ही दुनिया 
कुठे कुठे अन कसे पहावे देवाने! 

-भूषण कुलकर्णी 

संघर्ष

चार भावना, चार खयालांपुरते
जीवन उरले चार माणसांपुरते 

मला कळेना अर्थ कृतीचा माझ्या 
स्पष्टीकरण दिले मी इतरांपुरते 

शत्रू होते तेव्हा हिंमत होती 
कसे करू संघर्ष आपल्यांपुरते?

आपुलकी पूर्वीची उरली नाही 
निभावतो नाते मी वचनांपुरते 

डोह पाहिला आहे कोणी त्याचा? 
चित्र बनवले आहे लाटांपुरते

भरकटलेला आहे आत्मा माझा 
सांभाळुन घे काही जन्मांपुरते

-भूषण कुलकर्णी 

नोंद

तिची जन्मभर वाट पाहिल्यानंतर 
शून्य मिळाले दिवस मोजल्यानंतर 

सुंदर झाल्या होत्या काही वाटा 
एक चुकीचे वळण घेतल्यानंतर 

आसपासची दृश्ये मागे पडली 
समजत नाही वेग वाढल्यानंतर 

सभ्य जनांनी नोंद घेतली आहे 
मी छोटासा नियम मोडल्यानंतर 

वेष घेतला आहे मी पुरुषाचा 
जगापुढे भावनिक राहिल्यानंतर 

नियतीचे संकेत मिळाले होते 
अर्थ कळाले वेळ निसटल्यानंतर 

पुतळ्यांमधले दोष दिसेना झाले 
रोज सकाळी हार घातल्यानंतर 

कार्य तुझे अद्याप राहिले आहे 
भेट मला अवतार संपल्यानंतर 

-भूषण कुलकर्णी 

स्थिर

माझ्या वेगाला थोडीशी थोपवते आहे 
माझ्या पुढची गाडी नियती चालवते आहे 

मान ताठ ठेवावी जनसेवा करतानाही 
जणू पथावर झाडांची छाया पडते आहे 

सोडुन देऊ वर्षवर्ष जपलेल्या आठवणी 
पान किती सोनेरी गळताना दिसते आहे!

क्रमांक पहिला येणे अवघड असते केव्हाही 
उत्तेजनार्थ बक्षिस बऱ्याचदा मिळते आहे 

समाधान मानावे की मी अपेक्षा कराव्या?
दोन्ही बाजूंनी मन माझे नाचवते आहे 

ध्रुवताऱ्याचे वाटत आहे आकर्षण हल्ली 
तिथे असावी स्थिर दुनिया जी बोलवते आहे 

-भूषण कुलकर्णी 

सुदामा  

खऱ्या प्रेमात किंमत मागताही येत नाही 
सुदामा द्वारकेहुन एक वस्तू नेत नाही 

तपस्या एक झाल्यावर नको वर पाच मागू 
कुण्या एका जिवाला पूर्णता मी देत नाही 

परीक्षा घ्यायची आहे सभेतिल कौरवांची
खरोखर पाच गावे मागण्याचा बेत नाही 

खरे होईल खोटे गोपिकांना भेटल्याने 
बघा सांगून, कान्हा गोकुळाला येत नाही 

मनामध्ये सतत राधा स्मरण करते प्रियाचे
तरी लोकांपुढे ती नाव त्याचे घेत नाही 

कुणावर प्रेम व्हावे अन कुणाशी युद्ध व्हावे 
नियतकर्मात ठरलेले तुझ्या क्षमतेत नाही 

-भूषण कुलकर्णी 

सल्ला

जन्मभराचा रस्ता काही बदलत नाही 
बरा वाटला आधी, आता करमत नाही 

शिखराभवती गोलगोल फिरणारा रस्ता 
चढ आहे की उतार आहे समजत नाही 

एखाद्या वेळेला लहरी वागू शकते 
सगळ्या गोष्टी नियती आधी ठरवत नाही 

सल्ला देण्यासाठी दुनिया तयार असते 
पण सल्ल्याची जबाबदारी उचलत नाही 

खरे बोलणाऱ्यांचा प्रभाव पडला असता 
मात्र कुणीही शब्द स्वतःचे सजवत नाही 

काही कार्याद्वारे भक्ती घडून यावी 
देवासमोर एका जागी बसवत नाही

-भूषण कुलकर्णी 

कविता

तिच्यासाठी लिहाव्या वाटल्या कविता 
तिच्यामध्येच सगळ्या संपल्या कविता 

म्हणाली, का लिहित नाहीस तू हल्ली?
पुन्हा काही लिहाव्या लागल्या कविता 

कुणाची सावली पडली मनावरती?
सुरू झाले ग्रहण, अंधारल्या कविता 

दगड माती दरी डोंगर नदी सागर 
तिथे टाकून ओळी पिकवल्या कविता

खयालांना तसे रूपक मिळत नाही 
निराकारात पुरत्या हरवल्या कविता 

-भूषण कुलकर्णी