कधी वाटते, प्रसन्न इतकी सकाळ आहे
कधी वाटते, सगळे नीरस, रटाळ आहे
उगाच कोणी खलनायक झालेला नसतो
हरेक पात्राला त्याचा भूतकाळ आहे
किती वाजले होते नक्की तू जाताना?
त्या वेळेवर अजुन थांबले घड्याळ आहे
कुणी चोरले, कुठे हरवले माहित नाही
कधीपासुनी ह्रदय आपले गहाळ आहे
संत व्हायचे, हा काही व्यवसाय नसावा
संत कधी कुंभार, कधी मेंढपाळ आहे
-भूषण कुलकर्णी