शांत

तर्क ना संगत कशाची लागते
भावना कोठे कुणाची दाटते

एक दुखरी आठवण म्हणते मला
शांत बसण्याची भिती का वाटते?

एक माणुस मूळचा असतो खरा
दोन झाले की परीक्षा चालते

इंद्रियांना पाहिजे असते नशा
ती बरी, वाईट – दुनिया सांगते

आज थोडा वेळ काढुन पाहतो
कोण माझी वाट पाहत थांबते

वेळ थोडासा स्वतःला पाहिजे
याचसाठी रात्रभर मी जागते

-भूषण कुलकर्णी

Leave a comment