तिच्यासाठी लिहाव्या वाटल्या कविता
तिच्यामध्येच सगळ्या संपल्या कविता
म्हणाली, का लिहित नाहीस तू हल्ली?
पुन्हा काही लिहाव्या लागल्या कविता
कुणाची सावली पडली मनावरती?
सुरू झाले ग्रहण, अंधारल्या कविता
दगड माती दरी डोंगर नदी सागर
तिथे टाकून ओळी पिकवल्या कविता
खयालांना तसे रूपक मिळत नाही
निराकारात पुरत्या हरवल्या कविता
-भूषण कुलकर्णी