दर्शन

येता तुझ्या किनारी लाटांकडे बघू 
नंतर स्थिरावलेल्या क्षितिजांकडे बघू 

दिसते पुढे तसे ते नसते कधी कधी 
शोधायला खरे मग भासांकडे बघू 

एकेक वर्ष जगलो काही क्षणांमध्ये 
आता कशास फिरत्या काट्यांकडे बघू?

उशिरा परंतु उत्तम मिळतात माणसे 
मग वाटते नव्याने नात्यांकडे बघू 

उरलाय प्रश्न एकच दर्शन करूनही 
डोळ्यांकडे बघू की चरणांकडे बघू?

-भूषण कुलकर्णी 

One Comment

Leave a comment