ती मला दिसलीच नसती तर…
आठवण बनलीच नसती तर…
रोज हुरहुर लावते आहे
ओळ ही सुचलीच नसती तर…
दिवस उत्तम चालला होता
बातमी कळलीच नसती तर…
वेगळा दिसतो अता पाउस
काल ती भिजलीच नसती तर…
जात होतो सरळ वाटेने
वाट ही वळलीच नसती तर…
ती मला दिसलीच नसती तर…
आठवण बनलीच नसती तर…
रोज हुरहुर लावते आहे
ओळ ही सुचलीच नसती तर…
दिवस उत्तम चालला होता
बातमी कळलीच नसती तर…
वेगळा दिसतो अता पाउस
काल ती भिजलीच नसती तर…
जात होतो सरळ वाटेने
वाट ही वळलीच नसती तर…
कोण रंगारी मनाला रंगवत आहे?
नेमकी कुठली छटा तो दाखवत आहे?
कोणत्या रंगाविनाही छान दिसतो की!
चित्रकारालाच कागद थांबवत आहे
बालपण चित्रात आपण काढले होते
तेच रडवेल्या मनाला खेळवत आहे
बंद नव्हते दार त्याचे, किलकिले होते
आजही चित्रातले घर बोलवत आहे
पर्वताचे चित्र मी काढायला बसलो
पण झरा एकेक नेतो वाहवत आहे
शेवटी एकत्र केले रंग उरलेले
चित्र हे काळ्या छटांनी संपवत आहे
सर्व गावातल्या झोपल्या सावल्या
एक माझ्यातुझ्या जाहल्या सावल्या
पाय पडणार नाही प्रकाशावरी
पावलांना सदा बांधल्या सावल्या
जीवनाचा प्रवासी असा चालला
मिरवले ऊन अन् तुडवल्या सावल्या
ओल मातीत इथल्या सदा राहिली
माणसांच्या इथे झिरपल्या सावल्या
चांदणे सर्व घेऊन गेलीस तू
मात्र मागे तुझ्या राहिल्या सावल्या
नेमके काय घडले विचारू नका
काल भिंतीवरी हालल्या सावल्या
एवढा गर्द अंधार पडला कसा?
सर्व दुनियेतल्या सांडल्या सावल्या
तू अशानेच पडतोस काळा पुन्हा
रोज चरणी तुझ्या वाहिल्या सावल्या
रोज फुलांना भ्रमर कोणता भेटत आहे?
बागेमध्ये वसंत कायम नांदत आहे
बऱ्याच वेळा नजरेतच ती रमून गेली
आता ओठांपर्यंत कविता पोचत आहे
जरा वेळ गेल्यावर दिसतिल पाझरसुद्धा
मातीमध्ये सध्या पाणी झिरपत आहे
पाहत बसतो झाडे, पाणी, वारा, पक्षी
मला वाटते कोणी काही सांगत आहे
तुझा गंध येऊन पोचला आहे येथे
तिकडे जाता बाग वेगळी लागत आहे
माझी तर दुनियाच इकडची तिकडे झाली
तुला वाटले दोन दिसांची गंमत आहे
मी सध्याला आतापुरते बोलू शकतो
शब्द उद्याचा उद्याचसाठी ठेवत आहे
सांगतो आहे उखाणा नाव कोणाचे?
भान थोडे ठेव सत्याचे नि स्वप्नाचे
भेट झाल्यावर कळाले खूप दिवसांनी
दूर गेलेलेच नव्हते लोक प्रेमाचे
येथल्या मातीत आहे वेगळे काही
वेगळे दिसतात येथे रंग पाण्याचे
स्वस्त माझ्याएवढा नाही कुणी येथे
ज्ञानही नाही तुला बाजारभावाचे
पाहिजे किंवा नको इतके मला कळते
आणखी नाहीत कुठले भेद नात्याचे
भावना कळल्यात सध्या हे पुरे आहे
पदर उलगडतील नंतर गूढ अर्थाचे
हात हाती घेउनी चालायचे आहे
ध्येयही आपापले गाठायचे आहे
एवढे स्वातंत्र्य द्या प्रत्येक व्यक्तीला
गैरसुद्धा चांगले मानायचे आहे
मीठ, साखर वा कधी पाणी बनत गेलो
वाटले, लोकांमधे मिसळायचे आहे
सांग येऊ का तुला भेटायला आता
की तुला आधी कुणी भेटायचे आहे?
हात झाडाला तुझ्या लावायचा नाही
फूल पडलेले तिथे वेचायचे आहे
वळुन बघणाऱ्या मनाला सांत्वना देतो
याच वाटेने उद्याही जायचे आहे
अस्त होऊ द्या मला वेळेत बाबांनो
परत वेळेवर उद्या उगवायचे आहे
राहता येणार नाही ठाम शब्दावर
भरवसा नाही अता एकाच अर्थावर
फक्त मोठे ध्येय ठेवुन फायदा नाही
चालताना बदलतो बघ रंग क्षितिजावर
गाठला मुक्काम पण मी थांबलो नाही
एवढा जडला कसा हा जीव रस्त्यावर
क्षणभरापुरते रिकामे वाटते आहे
मग पुन्हा होईल काही स्वार ह्रदयावर
तो तुझ्या इच्छेविनाही गंध पसरवतो
एवढा नाही बरा विश्वास वाऱ्यावर
लाट प्रेमाची कधीची ओसरुन गेली
वाट पाहत राहिले कोणी किनाऱ्यावर
कितीही छान वळणावर कधी थांबायचे नाही
मनाला लाख सांगितले कुठे गुंतायचे नाही
तुला विश्वास माझ्यावर किती आहे ठरव आधी
पुढे ठरवू, जगाला भ्यायचे की भ्यायचे नाही
फुलावर काल भ्रमराला कळीने पाहिले होते
तरी कोणी तिला सध्या गुपित सांगायचे नाही
कधी चालायला शिकलो, मला ते आठवत नाही
पुढे म्हणता न आले की मला चालायचे नाही
कधीतर आडवाटेने पुढे लागेल चालावे
म्हणुन का सरळ रस्त्याने कधीही जायचे नाही?
मला आकाशगंगेने कळवले सत्य सूर्याचे
भटकतो तो कुणाभवती, खरे वाटायचे नाही
निरागस किलबिलाटाने मनाचे दार वाजवले
मना तू ऐक पक्ष्यांचे, अता बोलायचे नाही
छानशा वळणावरी आयुष्य थोडे थांबले
अन् पुढे चालायचे बळ त्या शिदोरीने दिले
ऐकतो सगळे नवे अन् दादही देतोच की
पण जुन्या गाण्यांत मिळते खास काही आपले
तीळ गालावर तुझ्या अन् गूळ ओठांवर तुझ्या
बघ तुझे पंचांग म्हणते, उत्तरायण लागले
अंबराचा स्पर्श झाला एकदा केव्हातरी
त्यापुढे मातीवरी सगळे सुखाने राहिले
युद्ध त्यांनी जिंकले पण द्वेष नव्हता संपला
दुश्मनाचे प्रेतसुद्धा शेवटी लाथाडले
देव मानू की नको, चर्चा सुरू मूर्तीपुढे
मी पुढे जाऊन केवळ फूल त्यावर वाहिले
एक नवा पर्याय गवसला
प्रश्न आणखी अवघड बनला
काया, वाचा वा ह्रदयावर
जीव कशावर आहे जडला?
प्रेमापत पोचलाच नाही
जरी खूप होता आवडला
चित्राची आकृती दिलेली
रंग भराया जन्म आपला
चित्र पूर्ण झाल्यावर कळले
योग्य तिथे तो ठिपका पडला
जुन्या चुका मी विसरुन गेलो
गुन्हा अशातच मोठा घडला
जरा वेळ आकाश पाहिले
पुन्हा आपल्या घरी परतला
कधीतरी जप करून म्हणतो
तुला किती आळवू विठ्ठला!