बाळकृष्ण

सोबती होते तरीही एकटे वाटायचे
दूर असलेलेच कोणी आपले वाटायचे

यार, जाणवलीच नाही बिलगलेली पौर्णिमा
दूर जे चमकायचे ते चांदणे वाटायचे

केवढ्या उशिरा समजले की तिथे होते झरे!
त्या ठिकाणी रोज सगळे कोरडे वाटायचे!

आज अंधारात त्यांची पाहिजे सोबत मला
भरदुपारी जे निकामी काजवे वाटायचे

ऐकुनी विश्वासही बसणार नाही रे तुझा
काय सांगू, कोण तेव्हा सोयरे वाटायचे

बाळकृष्णाची छबी दिसली मला त्याच्यामधे
राग आल्यावर कधी ते कारटे वाटायचे

लाभली दृष्टी नवी जेव्हा तुला मी पाहिले
मात्र पूर्वी प्रेम म्हणजे आंधळे वाटायचे

© भूषण कुलकर्णी

सांजवेळी 

गदिमा म्हणायचे, प्रत्येक कलाकृतीची स्वत:ची कुंडली असते. या गझलेबद्दल मी हे अनुभवलं. वैभव जोशी सरांनी गीतलेखनाची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली होती. पहिल्या दिवसानंतर आमच्या निवडक वृत्तबद्ध कविता पाठवायला सांगितल्या होत्या. तेव्हा मी ही गझल पाठवली, सरांना खूप आवडली, आणि श्रेयस बेडेकर यांनी मला बक्षीस म्हणून लगेच चाल लावली. दुसऱ्या दिवशी ती ऐकण्याचा क्षण अविस्मरणीय होता! एका रात्रीत मी गीतकार झालो होतो!!

वैभव सर म्हणाले होते, “एक गझल अशी आली की पुन्हा एकदा मला असं वाटून गेलं, अरे चुकली आपली बस, अपने को ये लिखना चाहिये था…”

ही दाद कायम प्रेरणा देत राहील मला आणखी चांगलं लिहिण्यासाठी!

श्रेयस सरांचे खूप आभार, मनात कायम राहील अशी चाल लावली आहे. संगीत संयोजक सत्यजित केळकर आणि सर्व वादकांचे खूप आभार. वैभव सरांमुळे हे सगळं शक्य झालं, त्यांना खूप खूप धन्यवाद!

हे गाणं नक्की ऐका:

कला

जितके अपुल्या कलेमधे ते मुरले होते
सादर केल्यानंतर तितके झुकले होते

तुझ्याच आठवणीत पुन्हा हा दिवस चालला
तूही क्षणभर मला कदाचित स्मरले होते

तुला पाहिजे होता सगळा सुगंध तेव्हा
अपुले नाते अजुन कुठे उलगडले होते?

एक छानशी कविता सुचली म्हणून हसलो
तुला वाटले, मला कुणी आवडले होते

अनेक सुंदर प्रवेश होते नाटकामधे
शेवटच्या अंकात स्वप्न ते सरले होते

निघतानाही वळून पाहू वाटत होते
जणू आपले काही मागे सुटले होते

© भूषण कुलकर्णी

शपथ

निसर्ग झंकारून सांगतो
मला हवी ती धून सांगतो

तुला कधी सापडलो नाही
थांब जरा शोधून सांगतो

समोरचा ऐकणार नाही
उगाच समजावून सांगतो

वाढदिवस हा आहे कितवा?
या ज्योती विझवून सांगतो

शेवट वा सुरुवात जमेना
माझा महिना ‘जून’ सांगतो

कायमचा विसरेन तुला मी
तुझी शपथ घेऊन सांगतो

किती रंग माझ्यात आणखी?
अता अस्त होऊन सांगतो

© भूषण कुलकर्णी

काळ

भूतकाळ हे भविष्यातले झाड लावणे असते
भविष्य म्हणजे घडले त्यावर छाया धरणे असते

नियतीच्या पुस्तकात केवळ दोन काळ लिहिलेले
वर्तमान तर दोघांमधला भेद ठरवणे असते

भूतकाळ हा परीक्षेतला सर्वोत्तम विद्यार्थी
इतरांच्या नशिबात त्याकडे वळून बघणे असते

आपण जगतो भूतकाळ अन् क्वचित बदलतोसुद्धा
भविष्य म्हणजे याला दुसरे नाव ठेवणे असते

भविष्यातला एकएक क्षण गतकाळाला मिळतो
गतकाळाला भविष्यही नेमाने बनणे असते

© भूषण कुलकर्णी

शंख

एक वेडा चंद्र पाहत राहिला
अन् जमाना त्यास हासत राहिला

आज रात्री फोन करते, बोलली
रात्रभर मग फोन जागत राहिला

अर्जुनागत कोरडा पडला घसा
आणि तिकडे शंख वाजत राहिला

मूळ मुद्द्यावर नको का एकमत?
हा खुळा पुढचेच बोलत राहिला

मार्क प्रश्नाचे किती, नव्हते कळत
प्रश्न तो सोपाच वाटत राहिला

संपली नव्हती परीक्षा अजुनही
तो पुन्हा उत्तर तपासत राहिला

© भूषण कुलकर्णी

रंग

प्रश्न सुटले वाटते, पण नेहमी उरतात काही
उत्तरामध्ये नको त्या शक्यता लपतात काही

उंच शिखराचेच वर्णन मांडले आहे जगाने
की जणू कुठल्या यशाला पायऱ्या नसतात काही!

रमवले होते मनाला, विसरलो होतो स्वतःला
पण पुन्हा माझ्यापुढे हे आरसे दिसतात काही

एवढे खंबीर केले सर्व लोकांनी मनाला
एकही अश्रू न दिसता पापण्या भिजतात काही

एक आणिक दिवस सरला एवढे आता समजते
रोज दिसते, आज दिसले, पाखरे उडतात काही

अस्त झाला, मात्र त्याची राहिली इच्छा असावी
त्याच आवडत्या दिशेला रंग घुटमळतात काही

© भूषण कुलकर्णी

भाळू नकोस मित्रा

हसण्यावरी कुणाच्या भाळू नकोस मित्रा
इतक्यात स्वप्न कुठले पाहू नकोस मित्रा

शब्दांत येउ दे अन् सुस्पष्ट येउ दे रे
डोळ्यांत प्रेमगीते वाचू नकोस मित्रा

देतील साथ अथवा ते राहतील मागे
मागे स्वतः कुणाच्या लागू नकोस मित्रा

असतो कुणाकुणाच्या अश्रूंत गोडवाही
डोळ्यांतल्या पुराने वाहू नकोस मित्रा

पैसा कमाव पुष्कळ, फिटनेस ठेव उत्तम
कुठलेच छंद दुसरे लावू नकोस मित्रा

उत्स्फूर्त येत होती, ती दाद येत नाही
त्यांच्यासमोर आता गाऊ नकोस मित्रा

जुळतो स्वभाव सुद्धा, होईल प्रेम सुद्धा
हे एकदाच होते, मानू नकोस मित्रा

© भूषण कुलकर्णी

मंथन

सुंदर आहे विश्व, आणखी सुंदर झाले असते
सगळ्यांना जर मनापासुनी हसता आले असते

आत उतरलो तेव्हा खोली जाणवली डोहाची
फक्त त्यामधे खडे टाकुनी काय कळाले असते?

तुझ्या सुगंधी फुलण्याला मी दुरून पाहत होतो
हात लावता फूलपाखरू दूर उडाले असते

टोकाचे नसतेच एवढे मंथन आयुष्याचे
उगा वाटते विषात वा अमृतात न्हाले असते

भेट व्हायची पुन्हा कधी हे आता माहित नाही
म्हणून तारे थांबलेत, अन्यथा निघाले असते

© भूषण कुलकर्णी

भेट

दिवे लागल्यावर तुझी भेट व्हावी
तृषा चेतल्यावर तुझी भेट व्हावी

अता शाल घेईल ती चांदण्यांची
नदी झोपल्यावर तुझी भेट व्हावी

कसा शांत होणार बेभान वारा?
म्हणे, थांबल्यावर तुझी भेट व्हावी

दवाचा प्रथम स्पर्श अलवार झाला
फुले लाजल्यावर तुझी भेट व्हावी

तुझ्या आठवांनी दिशा व्यापलेल्या
धुके दाटल्यावर तुझी भेट व्हावी

सरींनी नव्या तृप्त होईल माती
नि गंधाळल्यावर तुझी भेट व्हावी

पहा चंद्रताऱ्यांसही झोप आली
किती जागल्यावर तुझी भेट व्हावी?

निघालो सखे सत्य शोधायला मी
तिथे पोचल्यावर तुझी भेट व्हावी

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका: