मोर

जखमा सवयीच्या झाल्याने काही वाटत नाही
भरलेल्या मडक्यात आणखी पाणी मावत नाही

मेघ बरसले अवकाळी, नाचुन झाले मोरांचे
आजकाल श्रावणात कोणी तितका नाचत नाही

जरा मोकळी जागा दिसली, की ती काळी करतो
इतर कोणता रंग द्यायचा बाकी राहत नाही

पुढे जायचे आहे किंवा खोल जायचे आहे
एकदाच दोन्ही करणे अपुल्याला झेपत नाही

केवळ दुःखाच्या वेळेला अहं नकोसा होतो
बाकी तो वाईट कधी माझ्याशी वागत नाही

लोक भोवती होते तेव्हा स्वतःत गुंतत गेलो
आता बघतो तर कोणीही माझ्यासोबत नाही

© भूषण कुलकर्णी

कशासाठी?

थोर स्त्रीपुरुष सारे झुंजले कशासाठी?
मार्ग रोज मळणारे झाडले कशासाठी?

दुःख वाटले जेव्हा प्रश्न पाहिले सोपे
ज्ञान एवढे सारे मिळवले कशासाठी?

शक्यतो दिसत नाही ध्येय चालतेवेळी
वाटते पुन्हा, इतके चालले कशासाठी?

मूळच्या स्वभावाने लोक वागती सारे
आपल्या मनाला मी जाळले कशासाठी?

वेगळ्याच अर्थाने पाहिले तिला आम्ही
कल्पना म्हणाली, मी जन्मले कशासाठी?

चेहरेच पुतळ्यांचे आठवायचे होते
रक्त मग इथे त्यांनी सांडले कशासाठी?

सागरास मिळण्याचे स्वप्न तेवढे माझे
व्हायचे न मोती तर शिंपले कशासाठी?

मोहपाश सुटले पण प्रश्न शेवटी उरले
भाळले कशासाठी? टाळले कशासाठी?

© भूषण कुलकर्णी

प्रकाश

चालताना तोल माझा ढळत गेला
हात धरलेला तुझाही सुटत गेला

माणसाचा जन्म म्हणजे मद्यशाळा
जो कुणी आला, इथुन धडपडत गेला

माणसे वेगात मागे पडत गेली
अन् मला माझाच रस्ता दिसत गेला

मी प्रकाशाला सरळ समजून बसलो
मात्र तो आकर्षणाने वळत गेला

तो मनाला वाटले ते घेत गेला
हाच संगम संस्कृृृतींचा म्हणत गेला

वाचला सुविचार, त्याची ही कहाणी
कळत गेला, वळत गेला, टळत गेला

© भूषण कुलकर्णी

मी एकटा

मैफिलीचे स्वप्न पाहत रंगतो मी एकटा
मात्र मैफिल रंगल्यावर राहतो मी एकटा

कर कुणाच्याही हवाली तू ह्रदय आता तुझे
स्पंदने पण सर्व त्याची जाणतो मी एकटा

दिसत होते झाड मोठे, पण तरी मी टाळले
म्हणत होते की, फळे ही पिकवतो मी एकटा

वेदना सार्‍या जगाच्या घेतल्या ऐकून मी
शेवटी सारांश उरला, सोसतो मी एकटा

ते असे गेले पुढे, काही न झाल्यासारखे
मागच्या गोष्टींत वेडा गुंततो मी एकटा

पाहिले स्टेटस तुझे मी, टॅग अन् हॅश्टॅगही
पण तुझा प्रत्येक फोटो सांगतो, “मी एकटा”

मी इथे आलो कशाला? जात आहे मी कुठे?
उत्तरे याची नव्याने शोधतो मी एकटा

नाव काहीही असू दे, वासना वा भावना
आतल्या युद्धात केवळ जिंकतो ‘मी’ एकटा

© भूषण कुलकर्णी

झाशी

सलामत रहावी अयोध्या नि काशी
कराया हवी सज्ज प्रत्येक झाशी

जणू ग्रंथ डोक्याजवळ ठेवलेला
असू दे तुझा हात माझ्या उशाशी

इथे पंगती सारख्या मांडलेल्या
कसे ओळखावे अधाशी, उपाशी?

नको थांबणे अन् नको धावणेही
जगाने असा मोजला वेग ताशी

पडू द्या जरा बातमी थंड सध्या
नको द्यायला त्यास आताच फाशी

पहा, कल्पवृक्षास आला शहारा
कवी एक बसलाय त्याच्या तळाशी

© भूषण कुलकर्णी

पालखी

भूतकाळाची कबर उकरून झाली
राहिलेली हाडके चघळून झाली

होत आहे वेळ कसला निर्णयाला?
साक्ष सगळ्यांची अता वदवून झाली

वाटले, येशील मथुरेहून गावी
पण तुझी तर द्वारका वसवून झाली

जन्म सरल्यावर म्हणे, जगलोच नाही
कारणे आपापली ठरवून झाली

एक इच्छा शेवटी उरणार आहे
आज इच्छा कालची पुरवून झाली

न्यायची आहे कुठे, माहीत नाही
जीवनाची पालखी सजवून झाली

© भूषण कुलकर्णी

चांदणी

कसे कळावे, काय व्हायचे मरणानंतर?
कळेल हा पिंजरा, त्यातुनी सुटल्यानंतर

होती इतकी दूर चांदणी माझ्यापासुन
प्रकाश पोहोचला इथे, ती विझल्यानंतर

एखादा सांगतो स्वतःच्या इच्छा त्याला
एखादा हळहळतो, तारा तुटल्यानंतर

ही दुनिया जर स्वप्नच आहे कुणाचेतरी
विसरणार तर नाही ना तो उठल्यानंतर?

© भूषण कुलकर्णी

ऋतू

चालण्याची सवय जडली, थांबणे विसरून गेले
पोचता शिखरावरी काहीतरी हरवून गेले

वाद होता तो, तिथे संवाद नावालाच होता
काय जे बोलायचे, आधीच ते ठरवून गेले

आत जे आधीच होते, तेवढे संस्कार झाले
माहितीपुरतेच उरले, जे नवे शिकवून गेले

आठवण मधल्या ऋतूंची राहिली नाही जराही
तेच आठवतात जे फुलवून वा सुकवून गेले

© भूषण कुलकर्णी

राधा

सर्व जगाला श्रीकृष्णाची कोण दिसावी राधा?
केवळ देहच बघणार्‍यांना कशी कळावी राधा?

गोकुळापरी विश्व रहावे, नको द्वारका, मथुरा
कृष्ण नेहमी असेल येथे, तरी असावी राधा

गीतेचा उपदेश समजणे अवघड होई तेव्हा
कृष्णाची बासरी ऐकण्या मनात यावी राधा

सभोवताली किती रुपांनी मुरली वाजत असते!
कधीतरी या ह्रदयामधली जागी व्हावी राधा

पूर्णत्वाच्या मागे मागे विश्व धावते आहे
स्वयंपूर्ण तो मुरलीधरही म्हणे, मिळावी राधा

© भूषण कुलकर्णी

लिहितो

ह्रदयावरचे ओझे हलके करण्यापुरते लिहितो
कठीण वेळी मी थोडेसे हसण्यापुरते लिहितो

हसतेवेळी कधी खोलवर विचार पोचत नाही
म्हणून आपण बर्‍याचवेळा रडण्यापुरते लिहितो

प्रश्नपत्रिका आयुष्याची अवघड दिसते आहे
फारफारतर ढकलपास मी ठरण्यापुरते लिहितो

कविता ती, जी ह्रदयामध्ये दबून राहत नाही
खरा कवी त्यावेळी केवळ जगण्यापुरते लिहितो

विद्यार्थ्याचे साहित्याशी देणेघेणे नसते
आजकाल तो परीक्षेत गुण मिळण्यापुरते लिहितो

ती गेल्यावर जीवनातले गीत संपले होते
जे उरले ते तिला कधीतर कळण्यापुरते लिहितो

पात्रांनाही कधी कथानक त्याचे ठाउक नसते
असे नाट्य तो नशिबामध्ये बघण्यापुरते लिहितो

© भूषण कुलकर्णी