नाते तुझे नि माझे सांगू नको कुणाला
वैरी परस्परांचे वाटो भले जगाला*
जास्तीत जास्त अपुल्या होतील चार भेटी
मग एवढी तयारी प्रत्येकदा कशाला?
अर्धा भरून किंवा अर्धा म्हणा रिकामा
आधी पहा, कदाचित गळका असेल प्याला
पत्ता मनातला जो खोडायला निघालो
संदेश एक नावापुरता तिथून आला
धावायचा सदा तो, पण थांबलाय आता
रस्त्यास अंत नाही, वाटत असेल त्याला
आता जराजराशी ही ज्योत मंद व्हावी
होईल शांत तेव्हा समजू नये कुणाला
© भूषण कुलकर्णी
(* मतला सुचवला आहे गोपीनाथ लंगोटे यांनी)