ज्या स्वप्नाच्या मागे पळतो, नंतर कळते नको मला ते
माझ्या कोत्या कल्पनेत जे येऊ शकते, नको मला ते
भल्याबुऱ्या लाखो लोकांनी बनलेल्या आहेत व्यवस्था
हळूहळू कोणीही त्यांचा हिस्सा बनते, नको मला ते
काया, वाचेवर होती ती सर्व बंधने सुटू लागली
म्हणे तरीही काळिज त्यांचे निर्मळ असते! नको मला ते
पुढे आणखी कसे जायचे विचारतो अनुभवी जनांना
ती व्यक्ती पहिलीच पायरी सांगत बसते, नको मला ते
बऱ्याच दुःखांवरती कुठली कृती करावी समजत नाही
सवयीने एखादी हळवी कविता सुचते.. नको मला ते
-भूषण कुलकर्णी