वागलो माझ्यापरीने चांगले
पण जगाचे नियम होते वेगळे
चार जागी विखुरली माझी मुळे
कोणत्या मातीतले मी रोपटे?
वेळ हातातून माझ्या निसटला
एक नाते त्याबरोबर संपले
कळस म्हणतो, स्थैर्य अन शांती हवी
पायरी म्हणते, कळस गाठायचे
भेट झाली काल ती होती खरी
की मला स्वप्नात दिसली माणसे?
आतला आवाज मीही ऐकला
शब्द त्यानेही कितीदा फिरवले!
-भूषण कुलकर्णी