किती सांग देवा तुला आळवावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?
प्रभाती तिच्या गर्द अंधार झाला
शिळा होउनी राहिली मग अहिल्या
कुणी काय आयुष्य शापित जगावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?
उभा जन्म शबरी करी फक्त सेवा
अपेक्षा तिची की, इथे राम यावा
अशा योग्यतेचे कधी मी बनावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?
अजुन सोसते घोर अन्याय मीरा
गरीबीच वाट्यास येते कबीरा
तुझी योजना काय, कोणास ठावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?
जणू घेत आहेस अमुची परीक्षा
कधी वाटते, देत आहेस शिक्षा
मनातील वादळ कसे शांत व्हावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?
© भूषण कुलकर्णी