संघर्ष

चार भावना, चार खयालांपुरते
जीवन उरले चार माणसांपुरते 

मला कळेना अर्थ कृतीचा माझ्या 
स्पष्टीकरण दिले मी इतरांपुरते 

शत्रू होते तेव्हा हिंमत होती 
कसे करू संघर्ष आपल्यांपुरते?

आपुलकी पूर्वीची उरली नाही 
निभावतो नाते मी वचनांपुरते 

डोह पाहिला आहे कोणी त्याचा? 
चित्र बनवले आहे लाटांपुरते

भरकटलेला आहे आत्मा माझा 
सांभाळुन घे काही जन्मांपुरते

-भूषण कुलकर्णी 

नोंद

तिची जन्मभर वाट पाहिल्यानंतर 
शून्य मिळाले दिवस मोजल्यानंतर 

सुंदर झाल्या होत्या काही वाटा 
एक चुकीचे वळण घेतल्यानंतर 

आसपासची दृश्ये मागे पडली 
समजत नाही वेग वाढल्यानंतर 

सभ्य जनांनी नोंद घेतली आहे 
मी छोटासा नियम मोडल्यानंतर 

वेष घेतला आहे मी पुरुषाचा 
जगापुढे भावनिक राहिल्यानंतर 

नियतीचे संकेत मिळाले होते 
अर्थ कळाले वेळ निसटल्यानंतर 

पुतळ्यांमधले दोष दिसेना झाले 
रोज सकाळी हार घातल्यानंतर 

कार्य तुझे अद्याप राहिले आहे 
भेट मला अवतार संपल्यानंतर 

-भूषण कुलकर्णी 

स्थिर

माझ्या वेगाला थोडीशी थोपवते आहे 
माझ्या पुढची गाडी नियती चालवते आहे 

मान ताठ ठेवावी जनसेवा करतानाही 
जणू पथावर झाडांची छाया पडते आहे 

सोडुन देऊ वर्षवर्ष जपलेल्या आठवणी 
पान किती सोनेरी गळताना दिसते आहे!

क्रमांक पहिला येणे अवघड असते केव्हाही 
उत्तेजनार्थ बक्षिस बऱ्याचदा मिळते आहे 

समाधान मानावे की मी अपेक्षा कराव्या?
दोन्ही बाजूंनी मन माझे नाचवते आहे 

ध्रुवताऱ्याचे वाटत आहे आकर्षण हल्ली 
तिथे असावी स्थिर दुनिया जी बोलवते आहे 

-भूषण कुलकर्णी 

सुदामा  

खऱ्या प्रेमात किंमत मागताही येत नाही 
सुदामा द्वारकेहुन एक वस्तू नेत नाही 

तपस्या एक झाल्यावर नको वर पाच मागू 
कुण्या एका जिवाला पूर्णता मी देत नाही 

परीक्षा घ्यायची आहे सभेतिल कौरवांची
खरोखर पाच गावे मागण्याचा बेत नाही 

खरे होईल खोटे गोपिकांना भेटल्याने 
बघा सांगून, कान्हा गोकुळाला येत नाही 

मनामध्ये सतत राधा स्मरण करते प्रियाचे
तरी लोकांपुढे ती नाव त्याचे घेत नाही 

कुणावर प्रेम व्हावे अन कुणाशी युद्ध व्हावे 
नियतकर्मात ठरलेले तुझ्या क्षमतेत नाही 

-भूषण कुलकर्णी 

सल्ला

जन्मभराचा रस्ता काही बदलत नाही 
बरा वाटला आधी, आता करमत नाही 

शिखराभवती गोलगोल फिरणारा रस्ता 
चढ आहे की उतार आहे समजत नाही 

एखाद्या वेळेला लहरी वागू शकते 
सगळ्या गोष्टी नियती आधी ठरवत नाही 

सल्ला देण्यासाठी दुनिया तयार असते 
पण सल्ल्याची जबाबदारी उचलत नाही 

खरे बोलणाऱ्यांचा प्रभाव पडला असता 
मात्र कुणीही शब्द स्वतःचे सजवत नाही 

काही कार्याद्वारे भक्ती घडून यावी 
देवासमोर एका जागी बसवत नाही

-भूषण कुलकर्णी 

कविता

तिच्यासाठी लिहाव्या वाटल्या कविता 
तिच्यामध्येच सगळ्या संपल्या कविता 

म्हणाली, का लिहित नाहीस तू हल्ली?
पुन्हा काही लिहाव्या लागल्या कविता 

कुणाची सावली पडली मनावरती?
सुरू झाले ग्रहण, अंधारल्या कविता 

दगड माती दरी डोंगर नदी सागर 
तिथे टाकून ओळी पिकवल्या कविता

खयालांना तसे रूपक मिळत नाही 
निराकारात पुरत्या हरवल्या कविता 

-भूषण कुलकर्णी

शांत

तर्क ना संगत कशाची लागते
भावना कोठे कुणाची दाटते

एक दुखरी आठवण म्हणते मला
शांत बसण्याची भिती का वाटते?

एक माणुस मूळचा असतो खरा
दोन झाले की परीक्षा चालते

इंद्रियांना पाहिजे असते नशा
ती बरी, वाईट – दुनिया सांगते

आज थोडा वेळ काढुन पाहतो
कोण माझी वाट पाहत थांबते

वेळ थोडासा स्वतःला पाहिजे
याचसाठी रात्रभर मी जागते

-भूषण कुलकर्णी

गांधारीचा शाप

शेवटी संपले युद्ध
की मागे उरले पाप?
होईल तुझा कुलनाश
गांधारी देते शाप

द्वारका उभी द्वीपावर
रणभूमी पासुन दूर
मदिरेची धुंदी चढते
ललनांचे मादक सूर

सोन्याची उडते धूळ
बलशाली यादव वीर
काळाला सांगे छाती
धर तीन तपांचा धीर

मग कृष्णपुत्र सांबाने
अपमान ऋषींचा केला
ये, प्रलय होउदे आता
काळाला कृष्ण म्हणाला

शरदाच्या चांदणराती
मदमस्त जाहले लोक
अन दूर तिथे मुरलीवर
भैरवी वाजते, ऐक

कृतवर्मा, सात्यकि लढले
अन सोबत यादव सगळे
हतबुद्ध उभा बलराम
मृतदेह कुळाचे पडले

उद्धवा, सोड हे बंधन
श्रीकृष्ण सांगतो गीता
वाल्याचा लागुन बाण
योगीही निघे दिगंता

जा, धनंजया घेउन ये
यादवकुलस्त्रिया मुलांना
अन आठव तूही गीता
द्वारकापुरी बुडताना

-भूषण कुलकर्णी

खेळाडू

रोजच काहीतरी नव्याने घडत राहते
नंतर मन एखादी घटना स्मरत राहते

चंद्रासम तो माझ्याभवती फिरत राहतो 
केवळ एकच बाजू त्याची दिसत राहते

भजनामध्ये जेवणखाण विसरतो नवरा 
रोज दुपारी तीही डोंगर चढत राहते 

आकाशाची स्वप्ने पाहत असतानाही 
मनात का थोडीशी माती उरत राहते?

समुद्र, डोंगर, झाडे, प्राणी, झरे पाहिले 
सगळी जनता तेच तेच का बघत राहते!

ठिपक्यांनी भरलेला कागद पुढ्यात असतो 
त्यात उगा मी पूर्ण वर्तुळे करत राहते 

ऑफिसला चालला पहा माजी खेळाडू 
मैदानावर एक नजर भिरभिरत राहते 

-भूषण कुलकर्णी 

रोपटे

वागलो माझ्यापरीने चांगले
पण जगाचे नियम होते वेगळे

चार जागी विखुरली माझी मुळे 
कोणत्या मातीतले मी रोपटे?

वेळ हातातून माझ्या निसटला 
एक नाते त्याबरोबर संपले

कळस म्हणतो, स्थैर्य अन शांती हवी 
पायरी म्हणते, कळस गाठायचे

भेट झाली काल ती होती खरी 
की मला स्वप्नात दिसली माणसे?

आतला आवाज मीही ऐकला 
शब्द त्यानेही कितीदा फिरवले!

-भूषण कुलकर्णी