इतकीच आता प्रार्थना

हे ईश्वरा, परमेश्वरा, इतकीच आता प्रार्थना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

स्मरतात दाहक यातना
करतो निरर्थक कल्पना
सोडव मनाला यातुनी, दे शांतता, सद्भावना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

जाणीव आहे अंतरी
मी बुडबुडा पाण्यावरी
थेंबात माझ्या जाणवू दे सागरी संवेदना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

असतो कधी पेचात मी
रस्ते किती, अवधी कमी
क्षमतेस माझ्या वाव दे, सार्थक ठरव या जीवना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

सुंदर अशा क्षितिजाकडे
चालत रहावे यापुढे
आले मधे काटे तरी वाढत रहावी प्रेरणा
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

प्रेरणा राहिली नाही

ती मनात जेव्हा येते
सामर्थ्य केवढे देते!
पण जास्त थांबली नाही
प्रेरणा राहिली नाही

ऐकले गीत राजांचे
वाजले शंख क्रांतीचे
मग निवांत बसलो आम्ही
प्रेरणा राहिली नाही

पाहिले दीन अन् दुर्बळ
वाटली जराशी कळकळ
पण आत पोचली नाही
प्रेरणा राहिली नाही

वाचले थोर शास्त्रज्ञ
कळले, ज्ञान हेच सत्य
पण ध्यास लागला नाही
प्रेरणा राहिली नाही

ठरवले ध्येय वर्षाचे
अन् पुढे उभ्या जन्माचे
चाललो न अजुनी काही
प्रेरणा राहिली नाही

© भूषण कुलकर्णी

दवबिंदू

दिवाळीत ह्या खुलून यावे रंग आपले नवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

पुनवेला वा अमावसेला
चंद्र वास्तविक गोल सर्वदा
क्षमता आणिक संधीमधले जुळून यावे दुवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

किती दिली सूर्याने किरणे
हिशेब नाही कधी ठेवले
उजळू परिसर आपणसुद्धा जरी असू काजवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

ब्रह्मांडाच्या कालपटावर
पृृृृथ्वी क्षणभर, तारे क्षणभर
क्षणभंगुर पण असेल सुंदर, ते जीवन मज हवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

प्रेम असे निष्काम असावे

(भरत जेव्हा श्रीरामांना परत नेण्यासाठी हट्ट करतो, पण श्रीराम वचनपालनापासून ढळत नाहीत, तेव्हा सर्व लोक जनक महाराजांना निवाडा करण्याची विनंती करतात. त्यावेळी जनक महाराज म्हणतात…)

श्रींच्या चरणी अनन्य व्हावे
प्रेम असे निष्काम असावे

रामप्रभू हे धर्मध्वजाधर
भरता, तू प्रेमाचा सागर
इतका सुंदर बघता संगर
न्यायनिवाडे सर्व हरावे
प्रेम असे निष्काम असावे

हक्क तुझा रामावर भरता
हट्ट तुझा हा योग्य सर्वथा
निर्मळ प्रेमळ अंतर असता
धर्माहुन ते श्रेष्ठ ठरावे
प्रेम असे निष्काम असावे

एक नियम पण प्रेम पाळते
अपेक्षा न ते कुठली करते
विजय जगावर जरी मिळवते
विजयाचेही भान नसावे
प्रेम असे निष्काम असावे

भरता, तू जर राजा बनशिल
अपकीर्तीचा भागी होशिल
सोड भिती ही, राम पाहतिल
भक्ताने ना कशास भ्यावे
प्रेम असे निष्काम असावे

परिस्थिती ही राम जाणतो
तुझी स्पंदने राम ऐकतो
तो सार्‍यातुन तारुन नेतो
पूर्ण समर्पण तिथे करावे
प्रेम असे निष्काम असावे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

बासरी

ती बासरी मनाला
शोधून हाक देते
लाखात एकटीच्या
ह्रदयात साद जाते

त्या कृृृष्णबासरीने
माझी न मीच उरते
खांद्यावरून त्याच्या
हे सप्तसूर बघते

पडतात बासरीचे
मधुमंद सूर कानी
उरले कुठे कुणाला
बोलावयास काही?

मैत्रीण, प्रेयसी वा
मज काय नाव द्यावे?
मी कृृृष्णरूप झाले
त्यालाच सर्व ठावे!

© भूषण कुलकर्णी

भावना दुखावते

एक पान नेहमी हवेत हालते
एक ज्योत चारही दिशांत वाकते
त्यांस एक मंद झुळुकही सतावते
आमची तशीच भावना दुखावते

धर्म, जात, पंथ, वंश, आडनावही
देश, राज्य, प्रांत, गाव, वर्ण, खेळही
अस्मिता दिसेल, वा दडून राहते
आमची लगेच भावना दुखावते

गीत, लेख, गद्य, पद्य, चित्र, शब्दही
पोस्ट, त्यावरी रिएक्ट अन् कमेंटही
कोठुनी तरी मनात खुट्ट वाजते
आमची लगेच भावना दुखावते

पर्वतापरी बनव स्वतःस भावने
परतवून लाव सर्व वाद-वादळे
जी दुखावता प्रलय महान येतसे
भावना अशी जगास पूज्य होतसे

© भूषण कुलकर्णी

मग आपण मोठे झालो…

किती छान होते ते दिवस…
आई देवापुढे दिवा लावायची,
आपण हात जोडून बसायचो
बाबा कामाहून घरी यायचे,
आपण शिस्तीतही खुश व्हायचो
शाळेत शिक्षक शिकवायचे,
आपण मन लावून ऐकायचो
सरांनी, आईबाबांनी रागावलं,
तरी त्यांचा आदर रहायचा
खेळताना मित्रांशी भांडायचो,
नंतर पुन्हा सोबत खेळायचो
सचिन सेहवाग आऊट झाला,
तर वाईट वाटायचं, राग यायचा
पण पुढच्या मॅचला नक्की चालेल,
असा विश्वासही वाटायचा
‘शक्तिमान’ फक्त रविवारी दिसायचा,
आपण किती कौतुकानं पहायचो!
कधीकधी घरात गोडधोड व्हायचं,
त्याचं किती अप्रूप वाटायचं!

मग आपण मोठे झालो…
जीवनाचा अर्थ वगैरे शोधू लागलो
आई देवापुढे दिवा लावते,
आपण तिकडे बघत नाही
बाबा कामाहून घरी येतात,
आपण आपल्याच नादात असतो
काही नवीन शिकायचं म्हटलं,
की करिअरचा स्कोप विचारतो
स्टेटस बघून मित्र बनवू लागलो,
जरा बिनसलं की तोडू लागलो
चांगला सिनेमा बघत असताना,
मधेच मोबाइल चेक करू लागलो
कुणी लवकर आऊट झाला,
की “त्याला काढून टाका” म्हणू लागलो
वाटेल तेव्हा वाटेल ते खायला मिळतं,
पण आवडीचा पदार्थही
आता तेवढा आवडत नाही

करिअर, पैसा, यश, करमणूक,
या चार भिंतींत
अडकलोय का आपण?
मागं जाता येणार नाही,
खरंच इतकं पुढं
आलोय का आपण?
पण वाटतं कधीकधी,
पुढं जायचं ते कशासाठी?
कुणासाठी, आणि कुठपर्यंत?
जीवनाची दिशा सापडत नाही,
अर्थ तर मुळीच कळत नाही

अशा वेळी जगत राहूया…
घरून एक फोन येतो,
बरं वाटतं तेव्हा
जुन्या मित्राचा मेसेज येतो,
बरं वाटतं तेव्हा
कंपनीत कुणी हसून बोलतं,
बरं वाटतं तेव्हा
असं बरंच काही होतं,
बरं वाटतं तेव्हा!

जीवनाचा खरा अर्थ जेव्हा कळेल,
‘जगणं’ हाच तर तो अर्थ नसेल?

© भूषण कुलकर्णी

बहाव

क्या कहूं तुम्हारे बहाव पर?
रह गया मैं हमेशा किनारे पर

गलत फहमी को क्यों दिल में रखा?
सच्चे साथी कम होने पर

दिल बारबार पीछे देखता है
आगे का रास्ता धुंधला दिखने पर

दरवाजा खुला ही रखा है
एक अवसर निकल जाने पर

याद यहाँ की यहीं खतम हो जाए
फिर बोझ न रहेगा अगले जनम पर

© भूषण कुलकर्णी

दोस्तों

जीवनकथा खुद की वे सुनाते हैं दोस्तों
पर दो चार किस्से वे छुपाते हैं दोस्तों।

सडक के दोनों तरफ ये पेड बताते हैं
जो राह में नहीं आते, वे बच जाते हैं दोस्तों।

क्षितिज के उस पार मुझे जाना ही नही है
क्षितिज के बाद ढलानें शुरू हो जाती हैं दोस्तों।

आलसी नहीं हैं वे, जो रास्ते में रुक गये
पर राह खोजते हुए, वे उलझ जाते हैं दोस्तों।

इन्सान जब अंदर से टूटने लगता है
तो सब लोग दूर नज़र आते हैं दोस्तों।

© भूषण कुलकर्णी

सहानुभूति

रामायण के अर्थ कुछ बदल रहे
रावण की अच्छाई के चर्चे हो रहे

महान भक्त था रावण, ये स्वीकार करना चाहिये
पर रामजी का शिवसमर्पण भी समझना चाहिये
स्वार्थ को छोडे बिना क्या भक्ती हो सके?
अहंकार के बादल भक्ती को ढक लिये
रावण की अच्छाई के चर्चे हो रहे

राम भरत के लिये अयोध्या राज्य छोडता है
पर रावण अपने भाई को अपमानित करता है
राज्य और परिवार को युद्ध में झोंक दे
पर बहन के लिये किया सीताहरण, ऐसा कहे
रावण की अच्छाई के चर्चे हो रहे

ये सहानुभूति सत्य को छुपा रही है
दुर्जनोंके दुर्गुणोंको माफ कर रही है
दुष्कर्म और दुर्भाग्य की हो रही मिलावटें
अब हमारा कार्य है, सत्य को जान ले
रावण की अच्छाई के चर्चे हो रहे

© भूषण कुलकर्णी