किती छान होते ते दिवस…
आई देवापुढे दिवा लावायची,
आपण हात जोडून बसायचो
बाबा कामाहून घरी यायचे,
आपण शिस्तीतही खुश व्हायचो
शाळेत शिक्षक शिकवायचे,
आपण मन लावून ऐकायचो
सरांनी, आईबाबांनी रागावलं,
तरी त्यांचा आदर रहायचा
खेळताना मित्रांशी भांडायचो,
नंतर पुन्हा सोबत खेळायचो
सचिन सेहवाग आऊट झाला,
तर वाईट वाटायचं, राग यायचा
पण पुढच्या मॅचला नक्की चालेल,
असा विश्वासही वाटायचा
‘शक्तिमान’ फक्त रविवारी दिसायचा,
आपण किती कौतुकानं पहायचो!
कधीकधी घरात गोडधोड व्हायचं,
त्याचं किती अप्रूप वाटायचं!
मग आपण मोठे झालो…
जीवनाचा अर्थ वगैरे शोधू लागलो
आई देवापुढे दिवा लावते,
आपण तिकडे बघत नाही
बाबा कामाहून घरी येतात,
आपण आपल्याच नादात असतो
काही नवीन शिकायचं म्हटलं,
की करिअरचा स्कोप विचारतो
स्टेटस बघून मित्र बनवू लागलो,
जरा बिनसलं की तोडू लागलो
चांगला सिनेमा बघत असताना,
मधेच मोबाइल चेक करू लागलो
कुणी लवकर आऊट झाला,
की “त्याला काढून टाका” म्हणू लागलो
वाटेल तेव्हा वाटेल ते खायला मिळतं,
पण आवडीचा पदार्थही
आता तेवढा आवडत नाही
करिअर, पैसा, यश, करमणूक,
या चार भिंतींत
अडकलोय का आपण?
मागं जाता येणार नाही,
खरंच इतकं पुढं
आलोय का आपण?
पण वाटतं कधीकधी,
पुढं जायचं ते कशासाठी?
कुणासाठी, आणि कुठपर्यंत?
जीवनाची दिशा सापडत नाही,
अर्थ तर मुळीच कळत नाही
अशा वेळी जगत राहूया…
घरून एक फोन येतो,
बरं वाटतं तेव्हा
जुन्या मित्राचा मेसेज येतो,
बरं वाटतं तेव्हा
कंपनीत कुणी हसून बोलतं,
बरं वाटतं तेव्हा
असं बरंच काही होतं,
बरं वाटतं तेव्हा!
जीवनाचा खरा अर्थ जेव्हा कळेल,
‘जगणं’ हाच तर तो अर्थ नसेल?
© भूषण कुलकर्णी